मूड फ्रेश राहण्याकरिता त्यांना खेळाच्या माध्यमातून हसत मुखं ठेवलं गेलं पाहिजे-आर्यन कासुर्डे

पाचगणी :(टीम कृष्णकुंज न्यूज)
प्रत्येक व्यक्ती जीवनात कधी ना कधी मानसिक समस्यांचा सामना करते. परंतु, आज मानसिक आजार वाढत आहेत. लहान मुले व शालेय विद्यार्थ्यांना देखील मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मानसिक समस्यांच्या निराकरणासाठी केवळ वैद्यकीय दृष्टिकोन न ठेवता समग्र दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. असे प्रतिपादन मास्टर इन क्लिनिक सायकॉलॉजिकल (मानसोपचारतज्ञ ) आर्यन कासुर्डे यांनी केलं.
पाचगणी, तालुका ( महाबळेश्वर) येथील नगरपरिषदेच्या मुलींच्या शाळेत विद्यार्थ्यांना शालेय जीवनात येणारे नैराश्य, चिंता, अभ्यासातील माईंड मुड, मानसिक ताण तणाव समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम उत्सव मंडळ, व इंझुनिटी ग्लोबल सर्व्हिसेस, यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. त्याप्रसंगी मानसोपचारतज्ञ कासुर्डे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्रीराम उत्सव मंडळाचे अध्यक्ष अनिल जोशी, इंझुनिटी ग्लोबल सर्व्हिसेस वेदांत कासुर्डे , शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण हिरवे , विक्रांत जाधव, रुपेश जाधव,अमोल बिरामणे, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना कासुर्डे म्हणाले की, लहान मुले व युवक देशाचे भवितव्य आहेत असे सांगून प्रत्येक शाळेत मानसोपचार तज्ज्ञ असावे तसेच मानसिक आरोग्य हा विषय मुलांना शाळेतून शिकवला जावा, असेही ते म्हणाले.
प्रथमतः या शाळेतील २६ विद्यार्थिनीची मानसिक नैराश्य, चिंता, अभ्यासातील माईंड मुड, या तिन्हीची लेखी चाचणी घेण्यात आली होती. याचे मूल्यमापन करण्यात आले. या चाचणीतून शालेय विद्यार्थी लहान गोष्टी मनाला लावून घेत असल्याचे निदर्शनास आले. त्यांचा मूड फ्रेश राहण्याकरिता त्यांना खेळाच्या माध्यमातून हसत मुखं ठेवलं गेलं पाहिजे.या कार्यक्रमास शिक्षक श्रीकृष्ण कापसे, रामचंद्र कांबळे, शिक्षिका वंदना शिंदे, वैशाली घोणे, दीपाली कासुर्डे, राणी मर्ढेकर, वनिता चिकणे, श्यामली गोसावीबुवा , सोनाली वन्ने उपस्थिती होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकृष्ण कापसे यांनी केले तर शेवटी आभार वंदना शिंदे यांनी मानले.
- विद्यार्थ्यांच्या मनात नक्की काय चालू आहे. हे समजून घेण्याकरिता मानसिक संतुलन चाचणी प्रत्येक शाळेत घेणे गरजेचं आहे. या मधून विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीचा अंदाज येणार आहे. त्याच बरोबर मानसिक संतुलन या विषयी मानसोपचार तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे…!!
