भिलार गट–गणात राष्ट्रवादीची ‘वज्रमूठ’; केळगणे, भिलारे अन् चोरमले यांची विजयाकडे झेप!

भिलार | (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)महाबळेश्वर तालुक्यातील सत्तेचे मुख्य केंद्र असलेल्या भिलार गट आणि गणात राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पकड अधिक घट्ट केली आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी घेतलेली झेप आणि मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहता, या निवडणुकीत राष्ट्रवादीचा ‘एकहाती विजय’ निश्चित मानला जात आहे.
बड्या नेत्यांचे मार्गदर्शन आणि सक्षम नेतृत्व
राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली जात आहे. जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांचे सक्षम नेतृत्व आणि जिल्हा नियोजन समितीचे समन्वयक प्रवीण भिलारे यांच्या नियोजनामुळे राष्ट्रवादीची संघटनात्मक बांधणी अत्यंत मजबूत झाली आहे. यामुळेच विरोधकांचे आव्हान फिके पडल्याचे चित्र दिसत आहे.
मैदानात असलेले राष्ट्रवादीचे ‘शिलेदार’:
* भिलार गट (जि.प.): संजय केळगणे
* भिलार गण (पं.स.): वंदना भिलारे
* मेट–गुताड गण (पं.स.): शकुंतला चोरमले
बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा दबदबा
भिलार हा भाग स्वर्गीय बाळासाहेब भिलारे यांच्या काळापासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यांच्या निधनानंतर राजेंद्रशेठ राजपुरे यांनी ही राजकीय धुरा समर्थपणे सांभाळली असून, विकासकामांच्या जोरावर मतदारांचा विश्वास संपादन केला आहे. ‘गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता’ या धोरणामुळे राष्ट्रवादीची फळी वाडीवस्तीवर सक्रिय आहे.
प्रचाराचा झंझावात आणि विरोधक बॅकफूटवर
तिन्ही उमेदवारांनी गावोगावी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे. प्रचारादरम्यान दिसणारी कार्यकर्त्यांची एकजूट, जोश आणि सभेतील गर्दी यामुळे राष्ट्रवादीने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. विकासकामांचा ठोस लेखाजोखा मांडल्याने मतदारांनी राष्ट्रवादीच्या बाजूने स्पष्ट कौल दिल्याचे जाणवत आहे.
“भिलार गट आणि गणात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद नेहमीच वरचढ राहिली आहे. लोकाभिमुख कामे आणि कार्यकर्त्यांचे जाळे यामुळे यंदाही तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, यात शंका नाही.”
आता केवळ मतदानाची आणि निकालाची औपचारिकता बाकी असून, भिलारमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा विजयाचा गुलाल उधळला जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
