भिलार

पुस्तकांचे गाव भिलारमध्ये स्ट्रॉबेरी हंगामाची गोड सुरुवात!

पहिल्याच ट्रेला तब्बल ६०० रुपयांचा दर; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची लाली

भिलार (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)
भिलार (ता. महाबळेश्वर) – पुस्तकांचं गाव आणि स्ट्रॉबेरीचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिलार गावात यंदाच्या स्ट्रॉबेरी हंगामाची गोड आणि उत्साहवर्धक सुरुवात झाली आहे. डीएसबी ग्रुप अँड कंपनीचे संस्थापक दिनेश भिलारे यांनी पहिल्याच ट्रेला तब्बल ६०० रुपयांचा दर जाहीर केला असून, या रेकॉर्डब्रेक दरामुळे भिलारमधील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे फुल उमटले आहेत.
सध्या स्ट्रॉबेरी हंगामाला अजून दहा ते पंधरा दिवसांचा अवधी असतानाही भिलार परिसरात फळांची पहिली तोडणी सुरू झाली आहे. आज या पहिल्या ट्रेचे पूजन डीएसबी ग्रुपचे मालक दिनेश भिलारे यांच्या हस्ते पार पडले. पूजनानंतर ही स्ट्रॉबेरी थेट मुंबई बाजारात रवाना करण्यात आली. पहिल्याच तोडणीला इतका उच्च दर मिळाल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यातील स्ट्रॉबेरी उत्पादकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.
भिलारमधील शेतकऱ्यांना मिळालेला ६०० रुपयांचा दर हा गेल्या काही वर्षांतील सर्वाधिक दरांपैकी एक आहे. त्यामुळे शेतकरी यंदा नव्या उमेदीनं आणि आत्मविश्वासानं उत्पादनाच्या कामाला लागले आहेत.
सन २००७ मध्ये स्थापन झालेल्या डीएसबी ग्रुप अँड कंपनीने मागील १५ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने कार्य केले आहे. फक्त स्ट्रॉबेरीपुरतेच नव्हे, तर सफरचंद, पेरू, कीवी यांसारख्या फळांचंही खरेदी–विक्री व निर्यात या कंपनीमार्फत केली जाते.
दिनेश भिलारे यांच्या पुढाकाराने ॲमेझॉन, ब्लिंकिट, सुगी, झोमॅटो यांसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून भिलारची स्ट्रॉबेरी उपलब्ध होते आहे. त्यामुळे स्थानिक उत्पादकांना घरबसल्या जागतिक बाजारपेठेचा लाभ मिळत आहे.

दिनेश भिलारे म्हणाले,
“शेतकऱ्यांचा माल दर्जेदार असेल, तर त्याला योग्य दर मिळायलाच हवा. स्ट्रॉबेरीची गुणवत्ता वाढविणे आणि शेतकऱ्यांच्या हातात अधिक उत्पन्न पोहोचवणे हेच आमचं ध्येय आहे.”
त्यांच्या या उपक्रमामुळे भिलारमधील शेतकऱ्यांना केवळ आर्थिकच नव्हे, तर मानसिक बळही मिळत आहे. शेतकऱ्यांनी या दराचं स्वागत करत दिनेश भिलारे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
सहाशे रुपयांच्या पहिल्या दरासह भिलारमध्ये स्ट्रॉबेरी हंगामाची गोड सुरुवात झाली असून, पुढील काही दिवसांत या हंगामाला अधिक वेग मिळेल, असा विश्वास शेतकरी वर्ग व्यक्त करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button