आंबेनळी घाटातील खड्ड्यांना झेंडा : प्रशासन व मंत्र्यांना जनतेची चपराक!


महाबळेश्वर (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क जितेंद्र करंडे)
महाबळेश्वर–प्रतापगड दरम्यानच्या आंबेनळी घाटात पर्यटकांच्या जीविताचा प्रश्न उभा राहिलेला असताना प्रशासन मात्र कानाडोळा करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. रस्त्यात पडलेल्या प्रचंड खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका इतका वाढला आहे की स्थानिक नागरिकांनी एका खड्ड्यात बादली ठेवून त्यावर झेंडा लावून प्रवाशांचे प्राण वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. ही घटना केवळ प्रशासनाच्या निष्क्रीयतेवर बोट ठेवणारी नाही तर लोकप्रतिनिधींना मिळालेली जनतेची करारी चपराक आहे.
पर्यटनस्थळ की खड्ड्यांचे साम्राज्य?
महाबळेश्वर हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ, तर प्रतापगड हा युनेस्को जागतिक वारसा स्थळ. मात्र या दोन्ही ठिकाणांना जोडणारे रस्ते पाहिले की प्रश्न पडतो – आपण पर्यटनासाठी आलो आहोत की खड्ड्यांतून जीव मुठीत धरून प्रवास करण्यासाठी?
पाचगणी–महाबळेश्वर मार्ग प्रचंड खड्ड्यांनी विदीर्ण.
क्षेत्र महाबळेश्वरकडे जाणारा मार्ग देखील खड्ड्यांच्या विळख्यात.
प्रतापगडाकडे जाणारा आंबेनळी घाटही सुस्थितीत नाही; एका वळणावर तर खड्डे इतके खोल आहेत की प्रवाशांना ते नजरेसही पडत नाहीत, आणि अपघाताची भीषण शक्यता कायम असते.
मंत्रीमंडळाचा विसर?
या दयनीय परिस्थितीत सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जबाबदार कोण?
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री हेच महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई आहेत.
साताऱ्याचेच शिवेंद्रराजे भोसले हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत.
महाबळेश्वर-वाई मतदारसंघाचे आमदार मकरंद आबा पाटील, जे मदत व पुनर्वसन मंत्री आहेत, त्यांची ओळख ‘लोकनायक’ अशी केली जाते.
इतके सारे मंत्री एका जिल्ह्यात असताना महाबळेश्वर–प्रतापगडसारख्या आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या मार्गांची अशी दुरवस्था का? लोकप्रतिनिधींनी फक्त आश्वासनांचे फुगे फुगवायचे आणि प्रत्यक्ष कारवाई मात्र शून्य, ही वस्तुस्थिती पुन्हा अधोरेखित झाली आहे.
पर्यटक व नागरिकांचा सवाल
स्थानिक नागरिक आणि पर्यटकांचा रोष स्पष्ट आहे –
“मंत्रिमहोदय दरवेळी विकासाच्या गप्पा मारतात, पण प्रत्यक्षात महाबळेश्वर–प्रतापगड मार्गावर फिरले तरी समजेल, हा रस्ता आहे की खड्ड्यांचे साम्राज्य? आमच्या सुरक्षेचा, पर्यटकांच्या सोयीचा विचार कधी होणार?”
महाबळेश्वर व प्रतापगड हे फक्त भाषणांत पर्यटनाचा अभिमान म्हणून वापरण्याची जागा नाही. जर रस्त्यांची दुरवस्था अशीच कायम राहिली, तर पर्यटकांचा विश्वास उडेल आणि जिल्ह्याची बदनामीही होईल. प्रशासन व मंत्रीमंडळाने आता तरी जनतेचा आक्रोश ऐकून तातडीने रस्त्यांची दुरुस्ती केली पाहिजे. अन्यथा झेंड्यांनी खड्ड्यांची ओळख करून देणारे हे चित्र राज्याच्या पर्यटन धोरणावरच झेंडा फडकवून जनतेचा निषेध ठरेल.




