भिलारमहाबळेश्वर

कासवंडचे पठार: फुलांचा गालिचा आणि निसर्गाची मुक्त उधळण

भिलार, (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क): पुस्तकांच्या गावाच्या शेजारीच वसलेल्या आणि महाबळेश्वर तालुक्यात येणाऱ्या कासवंड पठाराने सध्या निसर्गाच्या मुक्तहस्ते केलेल्या उधळणीने पर्यटकांना भुरळ घातली आहे. हिरवागार गालिचा आणि त्यावर रंगीबेरंगी फुलांची आकर्षक आरास या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करत आहे.

महाबळेश्वर आणि वाईच्या सीमेवर असलेल्या कासवंड पठारावरील भिवसुळ्याच्या परिसरात विविध प्रकारची रानफुले फुलली आहेत. पावसाळ्याच्या अखेरीस इथल्या पठारांवर खास प्रकारची फुले फुलतात, जी सह्याद्रीच्या जैवविविधतेचं प्रतीक आहेत. यात सितेची आसवे, टोपली कारवी, रानहळद, ऑर्किड्स, गेंदा अशी अनेक दुर्मिळ फुले पाहायला मिळतात.
स्थानिक लोकांना या पठाराचं सौंदर्य माहीत असलं तरी बाहेरच्या पर्यटकांसाठी हे ठिकाण अजूनही फारसं परिचित नाही. हे पाहता, वन विभागाने या ठिकाणाला अधिकृतरीत्या पर्यटन स्थळ म्हणून घोषित करावं आणि पर्यटकांसाठी योग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी होत आहे.
पर्यटकांना आवाहन:
या फुलांच्या अविष्काराचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत. मात्र, निसर्गाची ही देणगी जपण्यासाठी पर्यटकांनी जबाबदारीने वागणं गरजेचं आहे. फुले तोडणे, परिसरात कचरा करणे किंवा झाडांना हानी पोहोचवणे टाळावे. निसर्गाच्या या अनोख्या कलाकृतीचा अनुभव घ्या आणि इतरांनाही तो घेण्यासाठी प्रोत्साहित करा.
कासवंड पठार हे केवळ फुलांसाठीच नाही, तर शांत आणि प्रसन्न वातावरणासाठीही ओळखलं जातं. या पठारावरून आजूबाजूच्या दऱ्या आणि डोंगरांचं विहंगम दृश्य पाहता येतं. त्यामुळे, निसर्गप्रेमी आणि शांततेच्या शोधात असणाऱ्यांसाठी हे एक आदर्श ठिकाण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button