आढाळ गावात आग लागून घर बेचिराख : आ. मकरंद पाटील यांनी भेट देवून जळीत ग्रस्त कुटुंबाला दिली ५० हजाराची मदत

भिलार (टीम कृष्णकुंज). महाबळेश्वर तालुक्यातील आढाळ गावात रात्री अचानक एका घराला आग लागून घर व घरगुती साहित्य जळून खाक झाले यामुळे हे कुटुंब बेघर झाले आहे. आगीचे कारण अद्याप समजले नसून आज लागलीच आमदार मकरंद आबा पाटील हे जळीत ग्रस्तांसाठी धाऊन आले. त्यांनी लागलीच तातडीची ५० हजार रुपयांची मदत देवून कुटुंबाला आधार दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की आढाळ (तालुका महाबळेश्वर ) येथील शेतकरी विठ्ठल रामचंद्र हिरवे यांचे घराने रात्रीच्या वेळी अचानक पेट घेतला. सारे घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घरातील सर्व लोक जिवाच्या आकांताने घरा बाहेर पडले. ग्रामस्थ व युवकांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु त्या आगोदरच घरगुती साहित्य, जीवनावश्यक साहित्य, कपडे सर्व साहित्य जळून खाक झाले. अंगावरील कपड्यानिशी हे कुटुंब घराबाहेर पडले. घटनेची माहिती मिळताच आमदार मकरंद (आबा) पाटील यांनी आढाळ गावाला भेट दिली आणि जळीत ग्रस्त कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न केला. आ. पाटील यांनी लागलीच कुटुंबाला वैयक्तिक ५० हजार रुपयांची रोख रक्कम देवून मदतीचा हातभार दिला. तर त्याचबरोबर जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांनी सुद्धा या कुटुंबाला दोन महिने पुरेल एवढा धान्यसाठा व इतर जीवनोपयोगी साहित्य तातडीने उपलब्ध करून दिले.यावेळी आमदार मकरंद (आबा)पाटील यांचेबरोबर जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपूरे, माजी सभापती संजय गायकवाड , रमेश चोरमले, गावचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार पाटील यांनी लागलीच महसूल विभागाला फोन करून तातडीने पंचनामा करणेबरोबरच या बेघर झालेल्या कुटुंबाला जास्तीत जास्त मदत देण्याच्या सूचना केल्या.
आ. मकरंद आबा पाटील यांनी तातडीने जळीत ग्रस्त कुटुंबाला भेटून विचारपूस करणेबरोबरच तातडीने मदत दिली. तर त्यांचेसमवेत असणाऱ्या राजेंद्र शेठ राजपुरे यांनी सुद्धा आपल्या परीने आवश्यक असणारा धान्यसाठा दिल्याने या कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी तरळून आले. आ. मकरंद आबा पाटील यांनी तातडीने जळीत ग्रस्त कुटुंबाला भेटून विचारपूस करणेबरोबरच तातडीने मदत दिली. तर त्यांचेसमवेत असणाऱ्या राजेंद्र शेठ राजपुरे यांनी सुद्धा आपल्या परीने आवश्यक असणारा धान्यसाठा दिल्याने या कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी तरळून आले.
